पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतर्फे तिरंगा फेरी   

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष

पिंपरी : ’ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष आणि भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी  शहरात रविवारी एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत  खासदार श्रीरंगअप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी  जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे कुणाल वाव्हळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव,  स्थायी समिती माजी अध्यक्ष नितीन लांडगे, सीमा सावळे, माजी नगरसेवक  भाऊसाहेब भोईर,  मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, सचिन चिंचवडे, शीतल शिंदे, विकास डोळस, संदीप वाघेरे, सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंघोळकर, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, योगेश लोंढे,  राम वाकडकर,  सुजाता पालांडे, सुलभा उबाळे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, निर्मला कुटे, मोना कुलकर्णी, आशा शेंडगे, आरती चोंधे, कुंदा भिसे, माजी सैनिक देविदास साबळे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, माऊली थोरात, संजय मंगोडेकर, अजय पाताडे यांच्यासह  नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.
 
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून या भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. याप्रसंगी, माजी सैनिक व अधिकारी आणि हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. हातात तिरंगा ध्वज घेतलेले नागरिक ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतीय सेना झिंदाबाद’ च्या घोषणा देत होते. संपूर्ण रॅलीमध्ये देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. ’ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेची चित्रफीत दाखवण्यात आली, तत्पूर्वी, माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, ३०० फूट भारतीय तिरंगी ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधले. 
 
यावेळी बोलताना माजी सैनिक मुरलीकांत पेटकर म्हणाले, पाकिस्तानने भारताच्या शांततेच्या प्रयत्नांना नेहमीच दुर्लक्षित केले आहे. आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. हे ऑपरेशन दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांना एक स्पष्ट संदेश आहे की, भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना याहून गंभीर परिणाम भोगावे लागतील. माजी सैनिक देविदास साबळे म्हणाले , ’ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीय सैन्याचे सामर्थ्य पुन्हा एकदा जगाला दिसून आले आहे.  या कारवाईने दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत आणि देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्यामुळे  दहशतवाद्यांना त्यांच्या समर्थकांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत आपल्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही. 
आमदार महेश लांडगे म्हणाले,  नागरिकांनी ज्या उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला, तो पाहून खूप आनंद झाला. हे आपल्या देशाच्या सैन्याबद्दलचे प्रेम आणि आदर दर्शवते. रॅलीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून करण्यात आला.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रिया कच्छावा, भारतीय स्त्री शक्तीच्या अधिवक्ता वर्षाताई डहाळे यांच्या भाषणाने  तिरंगा रॅलीची सांगता झाली.  शत्रुघ्न काटे यांनी आभार मानले. 

Related Articles